अहमदनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेशासाठी सज्ज झालेल्या आ.बबनराव पाचपुतेंच्या विरोधात आता भाजपातूनच भक्कम तटबंदी उभी राहू लागली आहे. मंगळवारी प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे आणि खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात नगरच्या शिष्टमंडळाने मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन पाचपुतेंच्या संभाव्य प्रवेशाला कडाडून विरोध केला. या विरोधाची दखल घेत ‘आपल्या तीव्र भावना दिल्लीतील वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील’ असा शब्द प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे वृत्त आहे.आ.पाचपुते यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत रोज नव्या बातम्या येत आहेत. याबाबत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत नसल्याची भावना काही दिवसांपासून भाजपात पसरली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला जाहीर विरोध सुरु केला आहे. मंगळवारी आ.शिंदे, खा.गांधी यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रा.भानुदास बेरड, नामदेव राऊत, विनोद बोथरा, अल्लाउद्दीन काझी आदींनी प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांची भेट घेतली. या भेटीत या नेत्यांनी पाचपुते यांच्या प्रवेशाला असणारा विरोध स्पष्टपणे नोंदविल्याचे वृत्त आहे. यावेळी काही नेत्यांनी पाचपुते यांची ‘राजकीय कुंडली’च प्रदेशच्या नेत्यांसमोर मांडली. त्याची दखल घेत फडणवीस यांनी जिल्हा भाजपाच्या भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आ.पाचपुते यांच्या विरोधात आता भाजपा नेत्यांनीही आघाडी उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक नेते त्यांचा संभाव्य प्रवेश म्हणजे ‘राजकीय संकट’ मानतात. पाचपुते यांनी संभाव्य भाजपा प्रवेशासाठी जिल्हाच नव्हे तर प्रदेश पातळीवरील नेत्यांना डावलून थेट दिल्लीशी संपर्क स्थापित केल्याची चर्चा आहे. हा संपर्कच अनेकांसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. (प्रतिनिधी)
भाजपा नेत्यांचा पाचपुतेंना तीव्र विरोध
By admin | Published: August 26, 2014 11:09 PM