आश्वी : एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार जणांचा अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची दुर्दैवी वेळ उंबरी बाळापूर ग्रामस्थांवर आली. सोमवारी येथील दोन तरूणांचा अपघाती मृत्यू झाला, तर इतर दोघा वृद्धांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे गावावर शोककळा पसरली. सोमवारी उंबरी बाळापूर गावावर काळाने घाला घातला. गावातील संतोष दगडू ब्राम्हणे (वय ३१) व राजेंद्र गोपीनाथ भुसाळ (वय ३०)या दोन विवाहित तरुणांचा कोल्हारकडे जात असताना प्रवरानगर शिवारात ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. त्याचवेळी गावातील रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त शिक्षक राधाकृष्ण धोंडिबा उंबरकर (वय ७५) व भागवत कारभारी होडगर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक मृत्युच्या घटनांचे निरोप गावांमध्ये येऊ लागल्याने गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ एक सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
एकाच दिवशी चार अंत्यसंस्कार
By admin | Published: July 19, 2016 11:38 PM