कर्जत/मिरजगाव : कोपर्डी घटनेनंतर खचलेल्या महिला व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग बुधवारी कोपर्डीत धावून आला. आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गावात पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोबाईलवरून दिले.गावातील पालक मुलींना शाळा, महाविद्यालयात पाठविण्यास घाबरत आहेत. या गावातील महिला व मुलींचे मनोधैर्य खचले असल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणाची बालहक्क आयोगानेही दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावातील मुलींच्या मनातील भीती दूर होण्यासाठी डॉ. मोनाली देशपांडे, गयाबाई कराड, मंगला सिवरा यांनी विविध घटनांचे दाखले देऊन मुलींचे, पालकांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. डॉ. रहाटकर यांनी मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करून या गावात एस. टी. बसची सुविधा तातडीने सुरू करण्याचे,कोपर्डी व कुळधरण येथे आजपासूनच पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या गुन्ह्याच्या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली आहे.
महिला आयोग वाढविणार मुलींचे मनोधैर्य
By admin | Published: July 20, 2016 11:41 PM