कोपरगाव: गोदावरी डावा तट कालवा बुधवारी पहाटे दुसऱ्यांदा फुटला़ त्यामुळे कोपरगावकरांच्या हक्काचे लाखो लीटर पाणी पुन्हा वाया गेले आहे. या प्रकाराने जलसंपदा विभागाचे पितळ उघडे पडले आहे. दारणा धरण क्षेत्रात पावसाने थैमान घातल्याने गोदावरी नदीला प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांना सोमवारी रात्री पाणी सोडण्यात आले. परंतु मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ब्राम्हणगाव शिवारात आहेर वस्तीनजीक डावा कालवा मुंगेर लागून भगदाड पडल्याने फुटला तर उजवा कालवा विंगणवाडीनजीक फुटला. दोन्ही कालवे फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. उजव्या कालव्याचे पाणी तातडीने बंद करून त्याची दुरुस्ती करण्यात आली. तर डाव्या कालव्याचा विसर्ग कमी करून संजीवनी साखर कारखान्याच्या पोकलॅन व जेसीबीच्या सहाय्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मातीचा भराव टाकून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, काही तासांचा अवधी उलटताच बुधवारी पहाटे मंडपी नाल्याजवळ डावा कालवा पुन्हा दुसऱ्यांदा फुटला. कालव्याचे पाणी माधव लक्ष्मण तडाखे यांच्या शेतात व मंडपी नाल्यात वाहून गेले. इतक्या प्रचंड प्रमाणावरील पाण्यात तडाखे यांच्या शेतातील मका व सोयाबीन पिके बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्यांदा कालवा फुटल्याच्या घटनेने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दुपारी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कालवा विभागाचे उपअभियंता भास्कर सुराळे, शाखा अभियंता आर. एस. काळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोदावरी कालवा दुसऱ्यांदा फुटला
By admin | Published: July 14, 2016 1:23 AM