नेवासाफाटा : दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना किमान पाच तास पाणी देण्याच्या मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता अन्नदाता शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला़ आंदोलकांनी महामार्गावरच टायर जाळून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली़ यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ विधानसभेने कायदा करुन पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्याप्रमाणे पहिले पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व त्यानंतर उद्योगासाठी पाणी द्यावे, असा कायदा सरकारने केला आहे़ मात्र, सरकारच हा कायदा मोडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवित आहे. कारखान्याचे पाणी बंद केले तर कर्मचाऱ्यांची उपासमार होईल, असा डांगोरा पिटवून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सुर्यवंशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास कोरडे, तालुकाध्यक्ष गफ्फुर बागवान, बद्रीबापू बोळवे, किशोर दसपुते, माउली मुळे, बद्री पाचोटे, शिवाजी रोडे, गणेश झगरे, रामदास विघ्ने, दत्तात्रय कुलट, विजय जगधने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महामार्गावरच टायर पेटविले़ त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ त्याचवेळी नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी आंदोलकांशी चर्चा करुन आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़मुळा पाटबंधारे विभागाचे राजेंद्र कांबळे, कामगार तलाठी सोपान गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. बिट हवालदार शिंदे, पोलीस नाईक शिरसाठ, लबडे, ढाकणे, जोशी, वाहतूक शाखेचे गरड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.(वार्ताहर)
नगर-औरंगाबाद महामार्ग अडविला
By admin | Published: April 23, 2016 11:39 PM