अहमदनगर : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी अजूनही महापालिकेची नालेसफाई मोहीम अटोपली नाही. छोट्या नाल्यांची सफाई मोहीम थांबली आहे. नालेसफाई नंतर निघालेला गाळ तसाच काठावर टाकला जात आहे. नालेसफाई मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे चित्र नगर शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. नगर शहरात २० मोठे तर ३० छोटे नाले असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. छोट्या नाल्यांची सफाई माणसांकरवी तर मोठ्या नाल्यांची सफाई ही जेसीबी मशिनच्या सहाय्याने करण्यात येते. २२ एप्रिल ते २२ मे या काळात छोट्या नाल्यांची सफाई खासगी ठेकेदारांकडून कराराने घेण्यात आलेल्या माणसांकरवी करण्यात आली. त्यानंतर करार संपला त्यामुळे ही मोहीम थांबली आहे. महिनाभरात केवळ ६० टक्के नालेसफाई झाल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. पैठणकर यांनीच स्थायी समितीच्या सभेत दिली. मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी चार जेसीबी सुरू आहेत. २० मे पासून मशिनच्या सहाय्याने नालेसफाई सुरू झाली आहे. शहरात २० मोठे नाले आहेत. नालेसफाईनंतर निघणारी घाण काठावर टाकली जाते. लोकवस्तीच्या ठिकाणी मात्र ही घाण दुसरीकडे वाहून नेली जाते. अन्य ठिकाणी ती तशीच काठावर टाकली जात आहे. पावसाळ्यातील पाण्याने ही घाण पुन्हा त्या नाल्यात वाहून जाते. वर्षानुवर्षे महापालिकेची अशीच नालेसफाई मोहीम सुरू आहे. त्याच त्याच नाल्याच्या सफाईसाठी वारंवार खर्च केला जातो. (प्रतिनिधी) नालेसफाई मोहीम उन्हाळ्यात सुरू केली जाते. पावसाळ्यापूर्वी ती संपणे अपेक्षित असते. पण महापालिकेची नालेसफाई मोहीम जूनच्या अखेरीस संपेल अशी माहिती सूत्रांनी दिली. पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्यानंतर महापालिकेची तारांबळ उडते. त्यापूर्वी दक्षता घेतली जात नाही. गतवर्षी झालेली सफाई मोहीम संशयाच्या भोवर्यात सापडली होती. सभागृहात तो विषय चांगलाच गाजला होता. यंदा मात्र प्रशासनाने काळजी घेतली आहे.
नालेसफाईचा बोजवारा!
By admin | Published: May 30, 2014 1:08 AM