श्रीरामपूर : श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. शुक्रवारी रात्री २० जणांनी मिळून दोघांना जबर मारहाण केली.कांदा मार्केटमध्ये जनावरांच्या दवाखान्याशेजारी राहणारे राजू कृष्णा वायकर व त्यांच्या साथीदारास मोटारसायकलवरून आलेल्या सुमारे २० आरोपींनी सोन्याभाऊ जेलमध्ये असल्यामुळे तू शिवजयंती साजरी करायची नाही, असे म्हणून धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केले. शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात दाखल केले. शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना त्यापूर्वीच टोळी युध्दाने पुन्हा डोके वर काढले. वायकर यास व त्याचा साथीदार शिवाजी बापू शिंदे यास झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन दुचाकी तोडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी गोविंद पवार, मयूर विष्णू जाधव, पंकज मतिक, अमोल लोडे, अशोक चव्हाण, निखिल सांगळे, गणेश विवेक जाधव, सागर शेटे, अजिंक्य दिनकर काथे, महेश शर्मा व राकेश पाटील आदी ११ जणांसह अन्य १० -१२ अनोळखी तरूण जमले होते. यावेळी वायकरच्या घरासमोर राजू अंबादास भोसले (रा.ब्राम्हणी, ता.राहुरी) हा उभा होता. आरोपींनी दोघांना तुला समजत नाही काय? सोन्याभाऊ तुरुंगात असताना शिवजयंती साजरी करायची नाही, असे म्हणत राजू भोसले यास लोखंडी रॉड, लाकडी दांडके व धारधार शस्त्राने वार करुन जखमी केले. तसेच शिवाजी बापू शिंदे यांच्या घरात घुसून त्याच्यावरही शस्त्राने वार करुन जखमी केले. दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वायकर मारहाण प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ व फौजदार भोळे यांनी घटनास्थळी जाऊन बंदोबस्त वाढविला. आरोपी महेश विश्वकर्मा, गणेश जाधव, मयूर जाधव, अमोल लोडे, अजिंक्य काथे या ५ जणांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास फौजदार भोळे करीत आहेत. (वार्ताहर)
श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्ध
By admin | Published: March 20, 2016 12:45 AM