मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरचौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या दहीहंडीतून अहमदनगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींना सुमारे ३८ कोटी रूपयांचा घसघशीत असा गोपाळकाला मिळाला आहे.गोकुळाष्टमीची दहीहंडी फुटली जात असतानाच राज्य सरकारने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीची दहीहंडी बुधवारी फोडली. त्यातून अहमदनगर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना अनुदानाचा गोपाळकाला मिळाला. अहमदनगर महानगरपालिकेच्या वाट्याला सर्वात जास्त १३ कोटी ५६ लाख १३ हजार ४२५ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. चौदाव्या केंद्रीय आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील मूलभूत अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटप राज्य सरकारने बुधवारी केले. त्यानुसार महाराष्ट्रातील ड वर्ग महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना ८२४ कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. हा निधी कशा पद्धतीने खर्च करायचा, याबाबत नंतर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहेत. या अनुदानातून खर्च करताना सरकार याबाबत जारी करणार असलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे मूलभूत अनुदानाचा हा पहिला हप्ता देण्यात आला. हा निधी पालिका संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़नगर महापालिकेला १३ कोटी तर श्रीरामपूरला ३ कोटी मिळणारजिल्ह्यात अहमदनगर महानगरपालिकेस सर्वाधिक १३ कोटी ५६ लाख १३ हजार ४२५ रूपये तर नगरपालिकांमध्ये सर्वाधिक ३ कोटी ३७ लाख ९१ हजार ७७७ रूपये श्रीरामपूर नगरपालिकेस मिळाले आहेत. संगमनेर पालिकेस २ कोटी ६१ लाख १४ हजार ६७२, कोपरगाव पालिकेस २ कोटी ५१ लाख ९६ हजार ६६८७, श्रीगोंदा पालिकेस २ कोटी २० लाख ९६ हजार २८३, नवनिर्मित शेवगाव पालिकेस २ कोटी १६ लाख ४ हजार ३४७, जामखेड पालिकेस २ कोटी २६ लाख ७० हजार ८१२, राहुरी पालिकेस १ कोटी ९५ लाख ९५१, राहाता-पिंपळस पालिकेस १ कोटी ९ लाख ६२ हजार ५०२, शिर्डी नगरपंचायतीस १ कोटी ४७ लाख ९४ हजार ६९१,पारनेर नगरपंचायतीस १ कोटी १६ लाख ९८ हजार ७७ रूपये, कर्जत नगरपंचायतीस १ कोटी २९ लाख ८५ हजार ४३२, अकोले नगरपंचायतीस ८९ लाख ४८ हजार ९८३ मिळतील.
पालिकांना ३८ कोटींचा गोपाळकाला
By admin | Published: August 25, 2016 11:35 PM