ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरगेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६०३ प्राथमिक शाळांमधील वीज बिल थकीत आहे. या थकीत बिलाचा आकडा ७४ लाख रुपयांपर्यत पोहोचला असून अनेक शाळांमधील वीज जोड बंद करण्यात आलेला आहे. यामुळे या ठिकाणी असणारे संगणक आणि अन्य विजेचे साहित्य पडून आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पहिल्यांदा प्राथमिक शाळांकडे असणाऱ्या थकबाकीची माहिती जिल्हास्तरावर संकलित केलेली आहे. साधारण पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विजेची फारशी आवश्यकता नव्हती. मात्र, ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये संगणक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला. यातून जिल्ह्यात २ हजारांच्या जवळपास डिजिटल स्कूल तयार झाले. अनेक शाळांमध्ये एलईडी टीव्ही, अद्ययावत साऊं ड सिस्टीम, अन्य विजेवर चालणाऱ्या अध्यापनाच्या साहित्याचा वापर वाढला. यातून शाळेचे वीज बिल वाढले. ते वेळीच न भरले गेल्याने प्रत्येक तालुक्यातून महावितरण कंपनीने शाळेचे वीज जोड तोडले असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त होत होत्या. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या सूचनेने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी तालुकानिहाय वीज बिलाचा थकीत आकडा संकलित केलेला आहे. साधारण ७४ लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे. हे बिल अदा करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. मार्चअखेर हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होणार असून त्यानंतर वीज बिल अदा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कडूस यांनी सांगितले.
शाळांचे वीज बिल थकले
By admin | Published: March 19, 2016 12:08 AM