नागेश सोनवणे, अहमदनगरहंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या नगर तालुक्यातील आढाववाडी ग्रामस्थांसाठी जिल्हा परिषद शाळा जलसंजीवनी ठरली आहे. शाळेमुळे संपूर्ण गावाचा पाणी प्रश्न सुटला आहे. चार वर्षांपासून गावकऱ्यांची सुरू असलेली पायपीट आता थांबली आहे़ गावाला पाणी पुरविणारी शाळा ग्रामस्थांनी डिजिटल करत कृतज्ञता व्यक्त केली आहे़ जेऊर परिसरात साधारण ३०० लोकवस्ती असणाऱ्या आढाववाडीत नेहमीचीच पाणी टंचाई. वाडीतील महिलांना पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत होती. उन्हाळ्यात दुष्काळ परिस्थितीत तर गावकऱ्यांचा जीव पाण्यासाठी कासावीस व्हायचा. गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेला अमेरिका येथील डॉ. सिद्धी शहा यांनी एक कूपनलिका आणि मोटार भेट म्हणून दिली. या कूपनलिकेतून रोज साधारण १० हजार लीटर पाणी मिळते. याच पाण्यावर शाळेने सुंदर आणि हिरवीगार बाग विकसित केल्याने शालेय परिसर निसर्गरम्य बनला आहे. चार वर्षांपासून ज्या ज्या वेळी गावाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, त्या वेळी हिच शाळा गावकऱ्यांसाठी मोठा आधारवड ठरली आहे. गावात पाण्याचे सारे स्रोत आटल्याने आता गावाची तहान याच कूपनलिकेवर भागत आहे. आज सारे गाव पिण्याच्या पाण्यासाठी या कूपनलिकेचा आधार घेत आहे. यामुळे शाळेत सध्या पाण्यासाठी रांगाच रांगा पहावयास मिळतात. विशेष म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य असल्याने या पाण्याने दुष्काळात गावाची तहान भागवली आहे. गावातील पशुधनासाठीही हे पाणी संजीवनी ठरत आहे. या शाळेत ३५ टक्के मुले अनुसूचित जमातीची आहेत. परिसरातील एकाही कूपनलिकेस पाणी नसताना शाळेतील कूपनलिकेस मात्र भरपूर पाणी आहे. जि. प. सदस्य बाजीराव गवारे आणि ग्रामस्थांचे उत्कृष्ट सहकार्य शाळेस मिळत आहे. र. सो. वाघ मुख्याधापक असून शाळा आज गावकऱ्यांची तहान भागवत असल्याचे समाधन असल्याचे ते सांगतात.
चार वर्षांपासून शाळा भागवते गावाची तहान!
By admin | Published: April 24, 2016 10:54 PM