अकोला : कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानावर येत्या पाच वर्षात दोन हजार कोटी खर्च केला जाणार असून, यंदा राज्यातील ४०३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील पिकाखालील क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेत होत असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्यांच्या उपजीविकेला अद्यापही स्थैर्य प्राप्त होऊ शकले नाही. या क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन व कृषीपूरक उपक्रमांसाठी सहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्यांच्या उत्पन्नात सातत्य टिकवता येईल व त्यामुळे स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. या उद्देशाने राज्य शासनाने गतवर्षापासून राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मणुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमासाठी येत्या पाच वर्षात २० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यातील दोन हजार कोटीची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररित्या उपलब्ध करू न देण्यात आली आहे. यंदा ४०३ गावांत हे अभियान राबविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव, पुणे, अहमदनगर,सोलापूर,सातारा,सांगली,लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली नांदेड, औरंगाबाद,जालना, बीड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील १६२ गावांचा समावेश करण्यात आला आहे; परंतु २०१३-१४ मधील या गावांचे अर्थात हे दुसरे वर्ष आहे. यावर्षीपासून नवीन प्रशासकीय परिपत्रकानुसार २०१४-१५ यावर्षासाठी राज्यातील १०८ व १३३ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे; परंतु नेमके अकोला जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. या नवीन यादीत उर्वरित गावे असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्र्रत्येकी एक गाव निवडण्यात आले होते. यामध्ये सारकिन्ही, गाजीपूर टाकळी, लामकाणी, मालठाण बु., काजीखेड, भंडारज या गावांचा समावेश होता.
कोरडवाहु शेती अभियानातुन अकोला जिल्ह्याला वगळले !
By admin | Published: May 19, 2014 7:17 PM