अकोला - महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर दुसर्याच दिवशी अतिक्रमण करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता मनपाच्या या विभागाने स्टेशन रोडवरील सावित्रीबाई फुले कन्या शाळेलगतचे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी नाली खोदून सदर जागा ही मनपाची असून, या जागेवर अतिक्रमण करू नये, असे फलक लावून अफलातून प्रयोग केला आहे. शहरात रस्त्यालगत अतिक्रमण असल्यास मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमण काढण्याची थातूरमातूर कारवाई करण्यात येते. त्यानंतर काही वेळातच सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण थाटण्यात येत असल्याने या पथकाची कुठलीही दहशत नसल्याचे दिसून येत आहे. त्या जागेवरील साहित्य जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. मात्र प्रशासनाकडून साहित्य जप्त करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारक अशा जागांवर पुन्हा अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. शहरातील काही मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने काढले असून, या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी सदर जागेवर मनपाच्या मालकी हक्काचे फलक लावले आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले कन्या शाळेलगत असलेल्या जागेवर मोठी नाली खोदून या ठिकाणी मालकी हक्काचे फलक लावण्यात आले असून, मनपाने अतिक्रमण रोखण्यासाठी हा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही या फलकावर देण्यात आला आहे. मनपाच्या या भूमिकेमुळे त्यांचा अतिक्रमणधारकांवर कुठलाही वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील अतिक्रमण रोखण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथकाने त्या जागेवर साहित्य जप्त करून अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अतिक्रमणाविरूद्ध अकोला मनपाचा अफलातून प्रयोग
By admin | Published: May 18, 2014 7:57 PM