अकोला : यंदा मान्सून वेळेवर सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे; परंतु बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई भासवून अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विकले जात आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करू न द्यावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकार्यांना साकडे घातले.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग,ज्वारीसह सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले होते. रब्बी पिकेही अवकाळी पावसाने ध्वस्त केली. यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड देत असताना यावर्षी सोयाबीन बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. बाजरात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. महाबीजच्या सभासद शेतकर्यांनी महाबीजला ४० ते ४५ रुपये प्रती किलोने सोयाबीन बियाणे विकले. तथापि, तेच बियाणे शेतकर्यांना आता ७५ रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. शेतकर्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन सुरुवातीला अडीच हजार रुपये प्रती क्विंटल विकले आहे. तथापि, शेतकर्यांना केवळ ३० किलो बियाण्यांचा बॅगसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेतकर्यांची ही लूट थांबविण्यासाठी कृषी अधिकार्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा यंदा शेतकर्यांना जमिनी पडीत ठेवाव्या लागतील. या संदर्भात सोमवारी शेकडो शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना साकडे घातले व एक निवेदनही सादर केले.
यावर जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सोयाबीनचे ३५ ते ४० हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे. दर एमआरपीनुसार आहेत; परंतु कोणी जास्त भावाने बियाणे विकत असेल तर त्या कृषी सेवा केंद्राचे अधिकृत नाव द्यावे किंवा तशी पावती आणावी, त्यावर लगेच कारवाई केल जाईल, असे आश्वासन दिले.