अकोला: शहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडून दररोज कुठे ना कुठे, नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वीच शहरात नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे समीर जोशी, पल्लवी जोशी व त्यांचे एजंट मोहन पितळे, मुकुंद पितळे, मंगेशी पितळेसह चार एजंटांविरुद्ध रामदासपेठ व खदान पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. शहरातील गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांनी श्रीसूर्या कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप केला. यासोबतच शहरात दररोज नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. राज्याबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या शहरात येऊन नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आमिष दाखवितात आणि कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात. काही महिने गुंतवणूकदाराला योजनेचा लाभ देतात. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली की आपला गाशा गुंडाळतात. नंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पैसे गुंतवणूक केलेल्या कंपनीची माहिती घेऊन, त्याबाबत खात्री करावी, असेही आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी सांगितले. छाया: इंटरनेटवरून आर्थिक गुन्ह्यांशी संबधित छायाचित्र वापरावे बातमीत बॉक्स आहेत. बॉक्स : मान्यता नसलेल्या कंपन्या याचा घेतात आधार नागरिकांचा विश्वास संपादन करायचा असल्याने कोणतीही वैधानिक मान्यता नसलेल्या फायनान्स कंपन्या, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, संस्था कार्यालयाच्या फलकावर नोंदणी क्रमांक म्हणून शॉप ॲक्ट लायसन्स क्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाचा आधार घेतात आणि शासनाची मान्यता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करतात. अशा कंपन्यापासून नागरिकांनी सावध राहावे.
इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या भूलथापापासून सावध
By admin | Published: May 20, 2014 12:42 AM