तेल्हारा: अकोट उपविभागातील तेल्हारा व अकोट तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व केळी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सोयाबीन व केळी पिकासाठी पीक विम्याची मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रामप्रभू तराळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली, तसेच पीक विमा काढला. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही, तसेच केळी पिकाचे नुकसान झाल्याने हिवरखेड शिवारात पाहणीही करण्यात आली. त्यामुळे शासनाने तेल्हारा व अकोट तालुक्यातील सोयाबीन व केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामप्रभू तराळे यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रमोद तराळे, कृष्णा तराळे, गौरव पाटील ढोले, विठ्ठल तराळे, ऋषिकेश तराळे, सुनील कराळे, कृषी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणिक घाटे, पत्रकार अशोक घाटे व राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे अ.शरीफ भुरू आदी उपस्थित होते.