प्रवीण खेते/अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांची कल चाचणी (मानसशास्त्रीय चाचणी) ८ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असून, येथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांच्या निवडीला प्रारंभ करतात; परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते चुकीच्या क्षेत्राकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव, नैराश्याचे प्रमाण वाढीला लागते. या प्रकाराला आळा घालून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, यादृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अंतर्गत गत दोन महिन्यांपासून राज्यभरात कल चाचणीची तयारी सुरू असून, ९ ते २३ डिसेंबर २0१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकांची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात जिल्हा पातळीवर प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात कल चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून, येत्या ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी घेण्यात येणार आहे. ही कल चाचणी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, २५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. १५२ प्रश्नांची कल चाचणीविद्यार्थ्यांंचा कल ओळखण्यासाठी घेण्यात येणार्या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहेत. चाचणीसाठी विद्यार्थ्यांना ४0 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना मिळणार रिपोर्ट कार्डइयत्ता दहावीच्या निकालासोबतच विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान
By admin | Published: February 01, 2016 2:09 AM