कोंडाळा महाली (जि. वाशिम), दि. २८- नजीकच्या भटउमरा येथील अल्पभूधारक शेतकरी अर्जुना नामदेव काळे (६0) यांनी शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.अर्जुना नामदेव काळे यांच्याकडे एक एकर शेती असून, त्यावर त्यांनी बँकेच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन केल्याची माहिती आहे. सोयाबीन, तूर या पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. आपणास कोणाचाही त्रास नव्हता, अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. अर्जुना काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
वाशिम जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या
By admin | Published: January 29, 2017 2:48 AM