आगर (अकोला) : येथे दारिद्र्यरेषेखालील पात्र कुटुंबांना इंदिरा व रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अनेक घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी काही लाभार्थींना दुसर्या हप्त्याच्या अनुदानासाठी नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगर येथील दारिद्र्यरेषेखालील पात्र कुटुंबांना वर्ष २०१२-१३ मध्ये रमाई आवास व इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाली आहेत. या लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी घरकुलाचे काम सुरू केले. या लाभार्थींपैकी अनेकांना दुसर्या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी घरकुलाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे नेले असून, त्यांना आता तिसर्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तथापि, या लाभार्थींपैकी काही जणांना अजूनही दुसर्या हप्त्याचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या घरकुलांची कामे रखडलेली आहेत. दुसर्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी या लाभार्थींकडून गाव पातळीवर पैशांची मागणी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. चिरीमिरी देण्यास नकार देणार्यांना त्यांचे घरकुल रद्द केले जाईल, अशी धमकीही दिली जात आहे. शासनाच्या योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थींना गावपातळीवर नाहक त्रास दिला जात असल्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र आगरमध्ये पहावयास मिळत आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे या लाभार्थींचे घरकुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना दुसर्या आणि तिसर्या हप्त्याच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे; परंतु प्रशासनाकडून त्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे लाभार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. लाभार्थींचा निधी नेमका कुठे अडविला जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
घरकुल लाभार्थींची अनुदानासाठी अडवणूक
By admin | Published: May 18, 2014 7:57 PM