मनोज भिवगडे/अकोला
अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्यांदा विजश्री खेचून आणताना सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धींवर आघाडी घेतली. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची एकप्रकारे सराव परीक्षा झाली. यात भाजप-शिवसेना युतीचे आमदार उत्तीर्ण झाले तर भारिप-बहुजन महासंघाच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात येणार्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ३ भाजप-सेना युतीच्या ताब्यात आहेत तर दोन भारिप-बमसंकडे आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ काँग्रेसकडे असून, तो त्यांनी पोटनिवडणुकीतही कायम राखला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी अकोला पूर्व आणि बाळापूरमध्ये भारिप-बमसंचे आमदार आहेत. अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर भाजपच्या ताब्यात असून, आकोट मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या सर्व आमदारांची एकप्रकारे विधानसभेपूर्वीची सराव परीक्षाच झाली. कोणता आमदार लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवारांसाठी किती मतं ओढण्यात सक्षम झाला, यावरच विधानसभेचे गणितं मांडले जाणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले मतं आणि विधानसभेत स्वपक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचे लेखापरीक्षण करणे सुरू केले आहे. ही तपासणी महानगरपालिका आणि नगरपरिषदेतील प्रभागांसह अगदी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट व गणांपर्यंत होणार आहे. विधानसभानिहाय मिळालेली मतांची टक्केवारी बघितली तर जिल्ात युतीचे आमदार या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर त्यांना विधानसभेत पराभव पत्करावा लागलेल्या विधानसभा मतदारसंघातही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे भारिप-बमसंचे आमदार त्यांना मिळालेल्या मतांएवढेही मतं लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी मिळवू शकले नसल्याचे दिसून येते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार जिल्ात निवडून आला नसला तरी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा वाढलेला मतांचा टक्का पुन्हा आशा पल्लवित करणारा ठरला आहे.
आकोट विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला विधानसभेमध्ये २५.५६ टक्के मतं मिळाली होती. लोकसभेत ही टक्केवारी ४७.३७ पर्यंत पोहोचली आहे. याच मतदारसंघात भारिपच्या उमेदवाराला २४.0४ टक्के मतं मिळाली होती. त्यांच्या टक्केवारीत ३ ने घट झाली आहे. काँग्रेसच्या टक्केवारीत मात्र ३ ने वाढ झाली. बाळापूर मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला ३८.२५ टक्के मतं मिळाली. विधानसभेत ही टक्केवारी २४.४५ होती. येथेही काँग्रेसचा टक्का वाढला असून, भारिपच्या मतांमध्ये ५ टक्के घट झाली आहे. हा भारिपचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. पक्षाची पत या मतदारसंघात कमी होत असल्याचे हा निकाल दर्शवित आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातही युतीचे मतं सुमारे १२ टक्के वाढली आहेत. २00९ च्या विधानसभेत या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला ३५.१९ टक्के मतं मिळाली होती. लोकसभेत ही टक्केवारी ४७.९४ वर पोहोचली आहे. काँग्रेसची टक्केवारी ही युतीच्या उमेदवारापेक्षाही अधिक टक्के म्हणजे १३ ने वाढली आहे. विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला २५.७0 टक्के मतं मिळाली होती तर यावेळी ३८.१६ टक्के मतं हिदायत पटेल यांनी घेतली आहेत. अकोला पूर्वमध्ये मात्र युतीने काँग्रेस आणि भारिप या दोन्ही पक्षांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. युतीच्या उमेदवाराला येथे ५३.४१ टक्के मतं मिळाली तर विधानसभेत २३.१0 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला १९.९३ टक्के मतं मिळाली होती. ही टक्केवारी आता १२.३१ वर आली आहे. भारिपच्या टक्केवारीत फारशी घसरण झाली नाही. १ टक्क्यापेक्षाही कमी मतं यावेळी भारिपच्या उमेदवाराला मिळाली. विधानसभेत या पक्षाला ३२.७२ टक्के मतं मिळाली होती. लोकसभेत ही टक्केवारी ३१.२३ एवढी आहे. याचाच अर्थ भारिपच्या उमेदवाराला मिळालेली मतं कायम राहिली असली तरी नवीन मतदार जोडण्यात मात्र ते अपयशी ठरले आहेत. मूर्तिजापूरमध्ये युतीच्या उमेदवाराची टक्केवारी केवळ ६ टक्क्यांनी वाढली आहे. विधानसभेत ३९.१३ टक्के मतं मिळविणार्या युतीला यावेळी ४५.३१ टक्के मतं मिळाली. भारिपच्या टक्केवारीतही यावेळी वाढ झाली आहे. विधानसभेत २७.१९ टक्के मतं मिळविणार्या भारिपला यावेळी २९.७६ टक्के मतं मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी मात्र हा विधानसभा मतदारसंघ धोक्याची घंटा वाजविणारा ठरला. विधानसभेत आघाडीच्या उमेदवाराला येथे २६.९२ टक्के मतं मिळाली होती. यावेळी ही टक्केवारी २१.८४ पर्यंत खाली आली आहे.
*रिसोडमध्ये काँग्रेसचा टक्का घसरला!
लोकसभा निवडणुकीसोबतच रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. यात काँग्रेसला विजय मिळाला असला तरी लोकसभेत मात्र काँग्रेसच्या टक्केवारीत घट झाली आहे. २00९ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे ३२.१५ टक्के मतं मिळाली होती. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला ३0.५६ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. या मतदारसंघात युतीची टक्केवारी २३.१८ वरून ४७.५६ पर्यंत पोहोचली आहे तर भारिपने ४.३८ टक्क्यांवरून १८.२९ टक्क्यांपर्यंत उडी घेतली.