अकोला : मोर्णा नदीच्या पात्रात वाढलेली जलकुंभी व दूषित पाण्यामुळे नदीचे सौंदर्य लयास गेले असून, पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने मोर्णा नदीला स्वच्छ करण्यासाठी महापालिका सरसावली असून, याकरिता नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (निरी) मदत घेण्यात येत आहे. सोमवारी निरी संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. पवन भाटिया अकोल्यात येणार आहेत. शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोर्णा नदीचा अनेक वर्षांपासून वापर सुरू आहे. अकोला ते वाशिम महामार्गावरील अनेक कारखान्यांचे दूषित सांडपाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून, याचा परिणाम पर्यावरणावरदेखील होत आहे. शिवाय नदीपात्रातील जलकुंभीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्य़ातील काही दिवस वगळल्यास वर्षभर नदीमध्ये जलकुंभी असते. मनपा प्रशासनाने अनेकदा जलकुंभी काढण्याचा कंत्राट दिला खरा; परंतु त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात प्रशासनाला अपयश आले. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नागपूर येथील निरी संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
‘मोर्णे’ला स्वच्छ करण्यासाठी महापालिका सरसावली
By admin | Published: May 19, 2014 1:27 AM