सायखेड (अकोला) : सततच्या नापिकीमुळे मानसिकरित्या खचलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्यांना आता बियाणे भाववाढीची भीती सतावत आहे. कपाशीला मागे ठेवत शेतकर्यांनी बर्यापैकी सोयाबीनला प्राधान्य दिले; परंतु हळूहळू मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत गेला व त्या प्रमाणात उत्पन्नात मात्र घट झाली. याशिवाय भावाची हमी नसल्याने तर शेतकर्यांना मिळेल त्या भावाने सोयाबीन विकावे लागले. यावर्षीची शेतकर्यांची दशा तर पाहावेनाशी आहे. खरिपात अतिवृष्टीचा, तर रब्बी हंगामात शेतकर्यांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतकर्यांचे पार कंबरडे मोडले. खिशात दमडीही नाही, सोसायट्यांनी कर्ज अद्याप दिले नाही. पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आले असताना सोयाबीनच्या बियाण्याचे भाव वाढणार असल्याची चर्चा आहे. व्यापार्यांकडे सोयाबीन बियाण्याचा माल येत आहे. नामांकित कंपन्याच्या ३0 किलोच्या सोयाबीनच्या बॅगवर २७00 रुपयांची एमआरपी प्रिंट करण्यात आली आहे. महाबीजचा भाव निघायचा आहे. महागड्या किमतीचे बियाणे खरेदी केल्यानंतर उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलाआहे. बियाणे घेताना शेतकर्यांनी विशिष्ट कंपनीचा आग्रह न धरता डबल लेबल असलेले बियाणे निवडल्यास काही विशिष्ट कंपन्याची मोनोपली राहणार नाही व त्यामुळे कृत्रिम भाववाढीस तोंड देण्याची वेळ शेतकर्यांवर येणार नाही. सोयाबीनपाठोपाठ या भागात घेतले जाणारे दुसरे पीक कपाशीचे आहे. यावर्षी कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकले नाही. हरभरा पिकाचे गारपिटीने नुकसान तर झालेच; परंतु हरभर्याला सध्या घेवालही नाही. या पृष्ठभूमीवर कपाशीचा पर्याय शेतकरी स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. बियाणे खरेदी केल्यानंतर औषधांचा खर्च हा सुद्धा आवाक्याबाहेरचा आहे. फवारणी केली नाही तर अळ्या पीक फस्त करतात. यामुळे काय करावे, हे शेतकर्यांना सुचत नाही.
बियाणे भाववाढीची शेतकर्यांना धास्ती
By admin | Published: May 18, 2014 7:57 PM