तिवसा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा परिसरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागला आहे.गत काही दिवसांपासून लग्नसराईत गुंतलेला शेतकरी आता शेतीच्या उन्हाळी मशागतीकडे वळला आहे. सध्या मे महिन्यात कडक उन्ह तापत असून, या प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकरी पहाटेच शेतात जाऊन काम करताना दिसत आहेत. शेताची नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे आदी कामांमध्ये शेतकरी व्यस्त झाला आहे. त्याचबरोबर उन्हाळी भुईमूग पीक काढणीचे कामेही वेगाने सुरू आहेत. शेतीची सर्व कामे एकाच वेळी आल्याने आणि मजुरांचे दर वाढल्याने अनेक शेतकरी आता यंत्रांच्या सहाय्याने शेती कामे करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी, नांगरणी कमी वेळात आणि अधिक परिणामकारक होत असल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याला शेतकर्यांची पसंती मिळत आहे. अल्पभूधारक शेतकर्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याने त्यांचा कल ट्रॅक्टरकडे वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना सुगीचे दिवस आले आहेत. आता त्यांनीही डिझेल दरवाढीचे कारण पुढे करून नांगरणी, वखरणी आदी कामांचे दर वाढविले आहेत. काही शेतकरी मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकर्यांची पेरणीपूर्व मशागत आटोपली असून, त्यांनी बी-बियाणे, रासायनिक खते आदी साहित्य जमा केले आहे. त्यांना आता केवळ पावसाची प्रतीक्षा आहे.
तिवसा परिसरात पेरणीपूर्व मशागतीला वेग
By admin | Published: May 17, 2014 6:35 PM