निहिदा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजारपेठ बंद असल्याने पिंजर परिसरात शेतकरी मातीमोल भावाने फळांची विक्री करीत आहेत. या उत्पन्नातून लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे.
खरबूज व टरबूज पिकाला सुरुवातीला चांगले दर मिळत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली. लॉकडाऊननंतर ग्राहक कमी झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात खरबूज, टरबुजाची विक्री करावी लागत आहे. सद्यस्थितीत १० ते २० रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. (फोटो)
----------------
गेल्या दोन वर्षांपासून मी टरबूज पिकाचे उत्पादन घेतो. यंदा लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरातील मार्केट बंद झाल्याने टरबुजाला मातीमोल भाव मिळत आहे. मजुरांची तोडणी, गाडीचे भाडेही वसूल होत नाही. कोरोनाच्या संकटात दोन्ही वर्षीही टरबुजाचे पीक तोट्यात गेले आहे.
- नीलेश राठोड, टरबूज उत्पादक शेतकरी, साखरविरा.
-----------------------------
मी यंदा सहा एकरामध्ये टरबुजाची पेरणी केली. यासाठी भरपूर खर्च केला, परंतू लॉकडाऊनमुळे तोट्यात आले आहे. मार्केट बंद असल्याने भाव मिळत नाही. यावर्षी मला लॉकडाऊनमुळे दोन लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
-पांडुरंग सोनाजी वालडे, कोथळी, महान