बच्चू कडू यांचे आंदोलन : बँक व्यवस्थापनाकडून माफीनामाआसेगाव पूर्णा : शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्ज पुरवठा व अन्य बँकिंग सुविधा मिळेपर्यंत ‘खुर्ची’ तारण ठेवण्याची नामुष्की आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापनावर ओढवली.आ.बच्चू कडू यांनी शेकडो शेतकऱ्यांसह गुरुवारी आसेगाव गाठून इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची खुर्ची बाहेर काढून आंदोलन केले. ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलनाला मूर्तरुप आले.इंडियन बँकेने ५ वर्षांपासून पीक कर्जाचा लाभ घेतलेल्या एकाही शेतकऱ्याला व्याजमाफीचा लाभ दिला नाही. शासनाकडून व्याजाच्या रकमेचा भरणा बँकेत करण्यात येत असताना या शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर गुरुवारी आ.कडू यांनी शाखा व्यवस्थापकाची खुर्चीच ‘तारण’ ठेवली आणि शाखा व्यवस्थापकानेसुद्धा मागण्यांची पूर्तता आम्ही करत नाही, तोपर्यंत स्वेच्छेने खुर्ची जप्त करून देत आहोत, असे लिहून दिले.दोन दिवसांपूर्वी आ. कडू यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलनाचे पत्र अग्रणी बँक, पोलीस अधीक्षक व इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी आ. कडू शेकडो शेतकऱ्यांसह या बँकेत पोहोचले. यावेळी राजेश वाटाणे, राजेश सोलव, प्रशांत नागापुरे, रामदास कैथवास, अजय तायडे, बसवंत कनोजे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांची माफीसन २०१३-१४ च्या पीककर्ज व्याजमाफीचा लाभ शेतकऱ्यांना न दिल्यामुळे बँक व्यवस्थापकाने आ. कडू यांच्यासह शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. त्यांना व्याजासह रक्कम एक महिन्यात परत करण्यात येईल. याशिवाय १ लाखापर्यंतचे पीककर्जाला तत्काळ व्याजमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. याशिवाय श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानातून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याची हमी मिळाल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले.
लाभ मिळेपर्यंत बँक व्यवस्थापकाची खुर्ची जप्त
By admin | Published: February 26, 2016 12:34 AM