अमरावती : पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या हंगामात स्पर्धेच्या निकषात शिथिलता व आवश्यक बदल करण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग लाभणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सन्मान केल्याने उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन अन्य शेतकऱ्यांना मिळून जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात भर पडणार आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या नावे जमीन असली पाहिजे व तो स्वत: शेती कसत असला पाहिजे, ही स्पर्धेची प्रमुख अट आहे.
शेतकऱ्यांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येणार आहे. मूग व उडदासाठी ३१ जुलै व धान, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व करडई पिकांसाठी ३१ ऑगस्ट ही डेडलाइन असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.