अमरावती : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भरमसाट वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा निषेध शहर कॉंग्रेसद्वारा शुक्रवारी सायकल रॅली काढून करण्यात आला.
कॉंग्रेस शासनाच्या काळात सिलिंडरचे दर ३४४ रुपये होते, आता ते ९४२ वर पोहोचले आहेत. त्यावरची सबसिडीदेखील नाहीशी झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. इंधनावरील या महागाईच्या निषेधार्थ ही सायकल यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी केले.
गर्ल्स हायस्कूल चौकातून या सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. सकाळी १०.३० निघालेल्या सायकल यात्रेचा विभागीय आयुक्त कार्यालय ते इर्विन चौकमार्गे राजकमल चौकात समारोप झाला. यामध्ये कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदीप हिवसे, सलीम बेग, शोभा शिंदे, अनिल माधोगडिया, फिरोज खान, प्रशांत महल्ले, अब्दुल वसीम, सादिक शाहा, भैयासाहेब निचळ, नितीन कदम, सलीम मरावाले, जावेद साबीर, प्रभाकर वाळसे, राजा बांगडे, नीलेश गुहे, राजेश ठाकूर, राजेश चव्हाण, सुनील कनोजिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.