लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महानगरात भटक्या श्वानांनी अक्षरशः हैदोस घातला असून, नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. भटक्या श्वानांपासून सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, पिसाळलेल्या श्वानांची संख्यावाढ ही लक्षणीय ठरणारी आहे. अमरावती, बडनेरा या शहरातील नागरिक भटक्या, पिसाळलेल्या श्वानांनी त्रस्त असल्याचे, जागोजागी असे चित्र आहे.
अमरावती महानगरात भटक्या श्वानांचा हैदोस हा गंभीर प्रश्न अतिशय नाजूक वळणावर पोहोचला आहे. रात्री- अपरात्री भटकी श्वान वाटसरू अथवा दुचाकी चालकांना अचानक घेरून हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. सीमेवरील नागरी वस्त्यांच्या भागात नॉनव्हेजचे टाकाऊ पदार्थ, हॉटेल अथवा मंगल कार्यालयातील खाद्यपदार्थ, उघड्यावर अन्न आदी आणून टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी भटके श्वान त्या भागात येत असल्याचे चित्र आहे. उघड्यावर मांस, टाकाऊ पदार्थ आणून टाकले जात असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही.
भटक्या श्वानांचा वाढला उपद्रव भटक्या श्वानांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी, रस्त्यावर संचार करताना आता नागरिकांना भीती वाटू लागली आहे. त्यासाठी पकड मोहीम आवश्यक आहे.
आकडेवारी अमरावती - १०१४६ धारणी - २३२४ अंजनगाव - १८३० अचलपूर - १००३ मोर्शी - ८३७ नांदगाव - ६२४ वरूड - ६०६ चांदूर रेल्वे - ६०४ तिवसा - ५८१ भातकुली - ४०४ धामणगाव - ३०९ चुर्णी - ९४
"श्वानांचे निर्बीजीकरण सन २०१७ पासून बंद आहे. एका एजन्सीला निर्बीजीकरणाची जबाबदारी सोपविली आहे." - डॉ. सचिन बोंद्रे, पशुशल्यचिकित्सक