३२५ मजुरांवर आजही अन्याय : साखर कारखान्याचे केवळ अवशेष शिल्लक, जमीन दलालांच्या घशातधामणगाव रेल्वे : सहकार चळवळ अधिक समृध्द होईल, शेतकऱ्यांची सावकाराच्या पाश्यातून मुक्तता मिळेल, शेतकरी हाच साखर कारखान्याचा मालक होईल, असे अनेक स्वप्न तालुक्यातील सहकार नेत्यांनी पाहून साखर कारखाना उभारला. परंतु अल्प काळाताच ही चळवळ पूर्णपणे खिळखिळी झाली़ सात वर्षांत शासनाने हा साखर कारखाना अवसानायात काढून याची कोट्यवधींची मालमत्ता अल्प किमतीत विक्री केली आहे़ पुन्हा हा कारखाना उभा राहणे शक्य नाही़ देवगाव साखर कारखान्याच्या जमिनीवर अतिक्रमण होऊन दलालांच्या घशात जात आहे़ या जागेवर मोठा उद्योग उभारावा, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेची आहे़सहकार महर्षी स्व़ अण्णासाहेब देशमुख यांनी प्राण पणाला लावून देवगाव सहकारी साखर कारखान्याची मुर्हूतमेढ रोवली होती़ अप्पर वर्धाच्या पाण्यामुळे ही अडचणसुध्दा दूर होईल ही दूरदृष्टी ठेवून अण्णासाहेबांनी साखर कारखाना उभारण्याचे धाडस केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून त्यांनी कारखान्याला परवानगी मिळविली. परंतु साखर कारखान्याचे बहरलेले विश्र्व बघण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला़ परंतु अण्णासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माजी मंत्री यशवंतराव शेरेकर यांनी खांद्यावर घेतली. ऊसाची लागवड नसतानाही बाहेरून ऊस आणून हजारो क्विंटल साखर उत्पादित केली़ या कारखान्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुरक्षित बेरोजगार यांच्या हातालाही काम मिळाले होते़अशातच काही विपरीत घटना घडत गेल्या़ ऊसासाठी पाण्याचे क्षेत्र कमी झाले आणि बाहेरून ऊस आणण्यासाठी वाहतूक खर्चही महागडा होत गेला़ परिणामी या साखर कारखान्याला उतरती कळा आली़ यशवंतराव शेरेकर यांनी अशा स्थितीत संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्याचा कारभार प्रशासकाकडे सोपविला आणि काही दिवसांतच आजारी कारखान्यांमध्ये देवगाव साखर कारखाना या एका नावाची अधिक भर पडली़ केवळ अवशेष शिल्लकहा कारखाना पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी शासनाला विनंती केली़ परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही़ अखेर कारखाना बंद पडल्याने तो बेवारस पडून चोरांना संधी मिळाली़ चोरट्यांनी या कारखान्यातील अनेक वस्तू चोरून नेल्यात़ मशीनचे अनेक भाग बेपत्ता झाले आहे. ती मशिनरी गंजू लागली़ त्यामुळे अवसानायात काढून प्रशासनाने कोट्यवधी रूपयांचा कारखान्याच्या मशिनी केवळ लाखो रूपयांत विक्री केल्यात.अल्प किमतीत विक्री १९९६ मध्ये बंद पडलेला कारखाना २ मे २००५ रोजी अवसानयात काढला. शासकीय मूल्यांकन साडेसात कोटी असताना केवळ हा कारखाना ३ कोटी ३६ लाख रूपयांत विक्री केली़ हा कारखाना सुरू असता तर ३२५ कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत दिसले असते़ याशिवाय २७५ हंगामी कामगार आणि इतर ५०० मजूर अशा जवळजवळ दीड हजार कुटुंबांचे पालन पोषण होऊ शकले असते़ परंतु हे शासनाला करायचे नव्हते, हे सिध्द झाले आहे़ येथील कारखान्याचा सांगाडा उभा असल्याचे दिसते. सुरक्षा रक्षकाला अनेक महिन्यांपासून वेतन नाही. आमच्या शेतजमिनी शासनाने परत द्याव्यात, या मागणीसाठी येथील शेतकरी लालफितशाईशी दोन हात करीत आहे़ येथील कर्मचाऱ्यांनी पहिली लढाई औद्योगिक न्यायालयात जिंकली. पी़एफ़ची रक्कम व वेतन देण्यात यावे, असा न्यायालयाने आदेश दिला़ आजही बँकेत ४५ लाख रूपये पडून असताना ही रक्कम देण्यास प्रशासन नसल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
देवगाव साखर कारखान्याचा उरलाय सापळा
By admin | Published: September 05, 2015 12:11 AM