मुख्य वनसंरक्षकांची तारांबळ, मुलाच्या पत्राचे वडिलांना उत्तर
अनिल कडू
परतवाडा : मांजरखेड कसबा शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा. त्याला तातडीने पकडण्याची व्यवस्था करावी, या मागणीचे पत्र आमदार प्रताप अडसड यांनी वनविभागाकडे ५ मार्चला पत्र दिले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष करून वनविभागाने चक्क त्या बिबट्यालाच पाठबळ दिले. यातूनच २९ मे रोजी दुपारी त्या बिबट्याने एका गुराख्यावर हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला.
शेतकऱ्यांना या बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे मजुरांचीही शेतात ये-जा बंद झाली असून, गावकरी संतप्त आहेत, असे या ५ मार्चच्या पत्रात आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले. पण, या पत्राकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न न करता, उलट त्यालाच पाठबळ दिले. यात पाळीव जनावरांवर हल्ला चढविणारा हा बिबट्या आता गुराख्यासह गावकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.
दरम्यान, आमदार प्रताप अडसड यांच्या या पत्राची अमरावती प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षकांनी दखल घेतली. उपवनसंरक्षकांना ९ मार्चच्या पत्राद्वारे निर्देश दिले. आमदार प्रताप अडसड यांच्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल विनाविलंब सादर करण्यास सुचविले. पण, मुख्य वनसंरक्षकांच्या निर्देशांनकडे संबंधित वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले.
उत्तर अरुण अडसडांना
मुख्य वनसंरक्षकांची हे निर्देश देताना तारांबळ उडाल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून आले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत पत्र आमदार प्रताप अडसड यांनी दिले. पण, या पत्राचे उत्तर अरुण अडसड यांच्या नावे पाठविले गेले. त्यात त्यांचा ‘विधानसभा सदस्य’ असा उल्लेखही केला गेला. प्रताप अडसड हे अरुण अडसड यांचे चिरंजीव. यात मुलाच्या पत्राला उत्तर वडिलांना पाठविण्याचा विक्रमही वनविभागाकडून आपल्या दप्तरी नोंदविल्या गेला.