लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी सन २०२० मध्ये तिवसा येथे केलेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा व अन्य ६३ आरोपींचे जबाब नोंदवून घेतले. कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्यासह ६४ जणांची कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीदेखील त्याच प्रश्नावर आंदोलन केले. ते सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावे, अशी खासदार राणा यांची मागणी होती. त्या प्रकरणी तिवसा व स्थानिक पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्या पाचही गुन्ह्याच्या अनुषंगाने मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ६ सुजित तायडे यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींचा जबाब नोंदवून घेतले; तर पाणीप्रश्नावर केलेल्या आंदोलनाच्या तीन प्रकरणांतदेखील पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. आरोप निश्चित करण्यात आले. ते आरोप आमदार राणा यांच्यासह ४१ आरोपींनी फेटाळले. त्यामुळे त्या तीनही प्रकरणांत खटल्याला सुरुवात झाली. आंदोलनाच्या आठही न्यायालयीन प्रकरणांमध्ये आमदार राणा, खासदार राणा व युवा स्वाभिमान कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बाजू ॲड. दीप मिश्रा यांनी मांडली.
शाईफेक प्रकरणात नीलेश भेंडेला अटकपूर्व जामीनआयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील आरोपी नीलेश भेंडे याला मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला; याच प्रकरणात अटक झालेले राज मिश्रा व राहुल काळे यांना नियमित जामीन देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ एस. बी. जोशी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. बचावपक्षाच्या वतीने ॲड. दीप मिश्रा यांनी युक्तिवाद केला.