अमरावती : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ येथील मुख्य कार्यालयानजीकच्या टेकडीला शुक्रवारी दुपारी ४ वाजता दरम्यान आग लागली. ही आग तासभर धगधगत राहिली. मात्र, यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी, पशूहानी झाली नाही.
एसआरपीएफचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आला. आग लागल्याचे लक्षात येताच समादेशक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने राज्य राखीव पोलीस दलातील जवान आग विझविण्यासाठी सरसावले. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उपपथक प्रमुख नेवारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रामेकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण टीम व जवान घटनास्थळी दाखल झालेत. आगीचे रौद्ररूप पाहता अग्निशमक दलालाही पाचारण करण्यात आले. वेगाची हवा आणि वाळलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. रेस्क्यू टीममधील अंमलदारांनी आगीचा संपर्क तोडण्याचा अथक प्रयत्न केला. अग्निशमन साहित्य व फावड्याच्या साह्याने व झाडातील फांद्याच्या साह्याने आग विझवणे व आगीचा संपर्क तोडण्यात येत होते. अग्निशमन दलाचे दोन बंब आग विझविण्याकरिता कार्यरत होते. यावेळी जवळच इलेक्ट्रिक डीबी असल्याने महावितरणची चमूदेखील घटनास्थळी पोहोचली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन चमूत हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, तर एसआरपीएफचे विधान बिश्वास, अली पठाण, विनोद धाडगे, विलास काळे, प्रशांत राऊत, नितीन मडावी, विशाल हंगरे, गणेश मेंढ, सचिन आंबेकर, गजानन नवगण, नीलेश बेलखडे तसेच अग्निशामक दलाचे अमोल साळुंखे, सुरेश पालवे, सुरज लोणारे, शुभम जाधव, धरमकुमार वाकोडे आदींचा सहभाग होता.