जिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समितीत मुद्यावर खल अमरावती : जिल्हा मत्स्य विभागा अंतर्गत मेळघाटात जि.प. सिंचन विभागाच्या सुमारे २३१ विविध तलावांत जलसाठा उपलब्ध असतानाही या विभागाकडून मत्स्य बीजपुरवठा करण्यास नेहमीच टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या कार्यप्रणालीवर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी पार पडलेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत.जिल्हा परिषदेची मेळघाटसह इतर तालुक्यात गाव तलाव, सिंचन तलाव आणि कोल्हापुरी बंधारे आहेत. यामध्ये आजघडीला जलसाठाही जवळपास ८० टक्यापेक्षा अधिक असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी सभेत सर्वच सिंचन विभागाच्या उपअभियंत्याना दिली आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने मागील वर्षी केवळ मेळघाटातील ३९ तलावांतच मत्स्यबीज टाकल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली. हा अपवाद वगळता २३१ तलावापैकी उर्वरित तलावात मत्स्यबीज टाकले नसल्याने याबाबत सिंचन विभागाने पत्रव्यवहार केला. मात्र दखल घेतली नाही. परिणामी जलसाठा असतानाही याचा उपयोग पुरेशा प्रमाणात केला जात नसल्याने शासनाचे उत्पन्नही बुडत आहे. पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केले आहे. त्यामुळे गाव तलाव, सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे यामध्ये जलसाठा असताना मत्स्यबीज टाकण्यासाठी पेसाअंतर्गत मेळघाटातील १३६ ग्रामपंचायतींना सुमारे ८ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला आहे, असे पंचायत विभागाचे डेप्युटल सिईओ आभाळे यांनी सभागृहात सांगितले. यावेळी इतरही प्रशनावर सभेत वादळी चर्चा करण्यात आली. सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्य महेद्रसिंग र्गैलवार, बापुराव गायकवाड, ज्योती आरेकर, अरूणा गावंडे, सिईओ अनिल लांडगे, डेप्युटी सीईओ जे.एन. आभाळे, कार्यकारी अभियंता पोटफोडे, श्र्वेता बॅनर्जी व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मत्स्य विभागाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे
By admin | Published: September 09, 2015 12:13 AM