संजय जाधव यांचे प्रतिपादन : प्रज्ज्वलन १६ चा उद्घाटन सोहळा अमरावती : विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात परिश्रम घेतल्यास झपाट्याने प्रगती साधता येते. तसेच तंत्र महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून चांगला उद्योजक घडू शकतो, असे प्रतिपादन उद्योजक व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी केले.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी राज्यस्तरीय तंत्रमहोत्सव प्रज्ज्वलन १६ चा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी जाधव बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तंत्रमहोत्सवात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात तंत्रमहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे सदस्य कुणाल टिकले, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशंसचे सहसंचालक सचिन गुल्हाने, माजी विद्दार्थी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टेंबे, प्राचार्य दि. ज. चौधरी, प्रज्ज्वलन १६ चे संयोजक अनंत धात्रक, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम उगिले व सहप्रतिनिधी आशिष कंकाळ व पियुष पारुलकर व्यासपीठावर उपस्थित होते. किरण गिते यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये येऊन समाज सेवेची संधी उपलब्ध असल्याची जाणीव करुन दिली. तसेच नविन उदयोजक होण्याकरिता मुद्रा बैंकेचे सहकार्य लाभेल असेही त्यांनी नमुद केले. गुडेवार यांनी अमरावती शहराच्या प्रगतीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाची आवश्यकता असल्याचे मत प्रकट केले. सचिन गुल्हाने यांनी आय. टी. क्षेत्रामध्ये प्रगतीकरिता मार्गदर्शन केले. चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संयोजक अनंत धात्रक यांनी महोत्सवाचे स्वरुप, महत्त्व व रुपरेषाची माहिती दिली. कार्यक्रमाला देशभरातून ७० अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हा महोत्सव २६ व २७ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडणार आहे. कार्यक्रमात आर.एस. दाडू, पी.एस. लांडे, आर.व्ही. मान्टे, कल्याणी देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तंत्र महोत्सवातून घडतात चांगले उद्योजक
By admin | Published: February 27, 2016 12:07 AM