पालकमंत्री प्रवीण पोटे : चौक, मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेअमरावती : आगामी गणेशोत्सव व बकरी ईददरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त करा. समाजातील काही विघ्न संतोषी लोकांमुळे उत्सवाला गालबोट लागू नये, उत्सवाच्या कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून गुंडागर्दी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गीत्ते, पोलीस आयुक्त चंद्रकांत व्हटकर, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अधीक्षक अभियंता बनगीरवार, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के आदी उपस्थित होते.उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी नगरपरिषदांबाबत बैठका घेऊन कार्यक्रम स्थळी वीज व पाण्याची सुविधा ठेवून उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण, विसर्जनाच्या ठिकाणी चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्यात. बकरी ईद सणानिमित्त गोवंश हत्या, पशुहत्या होऊ नये यासाठी त्यांच्या वाहतुकीच्या मार्गातील चेक पोस्टवर नाकाबंदी करावी, सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे तसेच आवश्यक ठिकाणी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि बंदोबस्ताची व्यवस्था करावी. उत्सवादरम्यान वीज व्यवस्था सुरळीत राहावी, असे निर्देशही दिलेत.अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदुर बाजार व दर्यापूर ही संवेदनशील शहरे आहेत. येथे कायदा व सुव्यवस्था चोख राहावी यासाठी एमपीडीए अंतर्गत कारवाई केलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस प्रशासनाला कळवावी. असे जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी बैठकीत सांगितले. गतवर्षी शहरात ५१४ गणेश मंडळ होते. यावर्षी ५४० पर्यंत ही संख्या राहील. या उत्सव दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने सी. आर. पी. एफ. व एस. आर. पी. एफ. च्या १६० जवानांची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. गतवर्षी गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना ध्वनी प्रक्षेपण वा अन्य तक्रारी बाबत क्रमांक १०० वर संपर्क साधता येईल. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार शहरात रस्त्यावर गणेश मंडप उभारण्यास फक्त २५ टक्के जागेची मुभा आहे. यापेक्षा अधिक जागेवर अतिक्रमण आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली. अचलपुर, अंजनगाव सुर्जी, चांदुर बाजार, मोशी , वरुड ही शहरे संवेदनशील असल्यामुळे पोलीस विभागाव्दारे सुरक्षा वाढविण्यात आली आहे.उत्सव काळत चोख बंदोबस्ताची सूचना अमरावती शहर तसेच अन्य शहरातून गणपती विसर्जनादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्चित करावा, तशी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी. चौका-चौकांत व मोक्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करावी. गतवर्षी ज्या मंडळाच्या तक्रारी होत्या त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रबोधन करावे.१७ ते २७ सप्टेंबरदरम्यान वीज भारनियमन करण्यात येणार नाही. अशी माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ज्या गणेश मंडळांचे गणपती विसर्जन २७ तारखेनंतर असेल त्या मंडळाची यादी पोलीस विभागाने वीज कंपनीला द्यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
उत्सवात सुव्यवस्था चोख ठेवा
By admin | Published: September 09, 2015 12:11 AM