पावसाची प्रतीक्षा : शेतकरी चिंतेत, उत्पन्नात घटीची शक्यतासुनील देशपांडे अचलपूरजवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस, वातावरणात निर्माण झालेली उष्णता त्यामुळे पिके कोमजत आहेत. दुसरीकडे संत्राबागांवर पडत असलेला कोळशीचा विळखा, कपाशीवर घोंगावणाऱ्या पांढऱ्या माशीचे संकट, झाडावरच पिवळे पडत असलेले घड आदी संकटांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. जवळपास २५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीत पिके धोक्यात आली आहेत. याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पेरलेली ही पिके शेतात डौलाने उभी असताना २५ दिवसांपासून अचलपूर तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी दिवस कंठत आहे. पावसाची विश्रांती अजूनही संपत नाही. सद्यस्थितीत पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सोयाबीन शेंगावर आले आणि पऱ्हाटी फुलावर येत आहे. पाऊस आल्यास सोयाबीनच्या शेंगांची भराई चांगली होईल आणि पऱ्हाटीच्या फुलांची म्हणजेच पुढे त्यालाच येणाऱ्या बोंडांचीही संख्या वाढेल. पर्यायाने कापसाचे उत्पादन चांगले होईल. पिकांना पाणी नसल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. काहींची पिके हातातून जाण्याचे चित्र आहेत. शेतकऱ्यावर वरूणराजा कोपला असताना वेगवेगळ्या पिकांवर रोगांचे संकट यायला लागल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीचे दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अचलपूर तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात
By admin | Published: September 08, 2015 12:13 AM