जिल्ह्यात सर्वत्र अटॅक : उपाययोजना नसल्यास उत्पादनात कमीअमरावती : जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विषाणूजन्य रोग इतर रोगकारकपेक्षा अधिक हानीकारक असल्याने या रोगामुळे उत्पन्नात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी रोगाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक ३ लाख २९ हजार २१४ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. वरुड वगळता सर्वच तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामधील सोयाबीन हे पिवळे पडत आहे. सोयाबीनचे पीक हे सध्या शेंगा धरण्याची तसेच शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. या रोगावर वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. काही जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळे मुळांना श्वासोच्छवास घेण्यात अडथडा होतो. यामुळे जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नाही. त्यामुळेसुध्दा पाने पिवळी पडतात. ज्या जमिनीचा सामू अधिक अम्लधर्मीय असतो अशा शेतामधील पाने जमिनीत अधिक ओलावा असल्याने पिवळी पडतात. जमिनीतील पोषण द्रव्य नत्र व पालाशाची कमतरता भासल्याससुध्दा पाने पिवळी पडतात. सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. यामुळेदेखील पाने पिवळी पडतात. पिवळ्या मोझॅक रोगामुळेसुध्दा पाने पिवळी पडतात. पानावर हिरवे-पिवळे चट्टे आढळतात. सूत्रकृमीच्या प्रादुर्भावानेसुध्दा पाने पिवळी पडतात. तसेच मुळकूज रोगाच्या प्रादुर्भावानेसुध्दा पाने पिवळी पडतात. यामुळे शेंगा पोचट राहतात व सरासरी उत्पन्नात कमालीची घटड होते. यासाठी वेळीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
पिवळ्या मोझॅकचे व्यवस्थापन महत्त्वाचे
By admin | Published: September 08, 2015 12:08 AM