गव्हाणकुंडं येथील मागील २ वर्षांपासून सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून निकेश कवडे, आनंद गाडबैल, विजय नागले कामावर होते. परंतु, लोकप्रतिनिधींनी मनमानी कारभार करून १ जुलै २०२१ पासून कामावरून कमी केले. त्यांच्या जागेवर नवीन युवकांना कामावर घेण्यात आले. यामुळे कामावरून कमी केलेल्या युवकांचा रोजगार हिरावला गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तर प्रशासनावर दबाबतंत्राचा वापर करून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरुद्ध ३९/१ नुसार तक्रारसुद्धा करण्यात आल्याचा आरोप करून या मनमानी कारभाराविरुद्ध गव्हाणकुंड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही तहसीलदारांना निवेदन देऊन ७ जुलैला मोर्चा काढण्याचे आव्हान केले होते. यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामवासीयांनी मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार देवानंद धबाले, एपीआय सुनील पाटील, पीएसआय हिवसे यांनी घटनास्थळावर जाऊन मोर्चेकऱ्यांची समजूत काढून प्रकल्पाचे अधिकारी संदीप रामटेके यांच्या समक्ष सात दिवसात प्रकरण निकाली काढण्याचे आणि पूर्ववत कामावर लावण्याचे आश्वासन दिले. मोर्चाचे शांत झाला . यावेळी मोर्चामध्ये सरपंच नंदकिशोर ब्राम्हणे, उपसरपंच प्रदीप मुरूमकर, माजी जि. प सदस्या अर्चना मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, इंद्रभूषण सोंडे, विनोद नागले अनिता नागले, किरण उईके, प्रतिभा गाडबैल, शेख मुन्शी, राजू बंदे, विक्की ठाकरे, सुरेश वांदे, विजय भलावी, अजय कवाडे, रामेश्वर कवडे, गणेश गाडबैल आदी शेकडो सहभागी झाले होते.
सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पावरील कामगारांना कमी केल्यावरून गव्हाणकुंडात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:10 AM