पत्रपरिषद : अर्थसंकल्पीय बजेटमध्ये व्हावी तरतूदचांदूररेल्वे : सततचा दुष्काळ, नापिकी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या इत्यादी सुरू असताना केंद्र व राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना कुठलीच मदत होत नाही. शेतकऱ्यांच्या निवेदनाला प्रशासकीय अधिकारी प्रतिसाद देत नाही. अनेक घोषणा होऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठलेही पॅकेज आजपर्यंत मिळाले नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. चांदूररेल्वे येथे ‘शिका व कमवा’ या कार्यक्रमानिमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आ. निरंजन डावखोरे, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, उपाध्यक्ष सलील देशमुख, अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, प्रदेश सचिव शेखर भोयर, प्रदीप राऊत, गणेश रॉय, कायक्रमाचे आयोजक विनय कडू उपस्थित होते. २२ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. विभागीय आयुक्तांवर मोर्चा काढून आंदोलन व्यापक बनविणार असल्याचे यावेळी सांगितले. विभागातील पाचही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांना चांगले पॅकेज देऊ, विद्यार्थ्यांची फी माफ करू, मराठा, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण असे अनेक आश्वासने या शासनाने दिले असून ते फसवे निघत आहे, याची आठवण करून देण्यासाठीच उद्याचे आंदोलन राहणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी विनेश आडतीया, गजानन रेवाळकर, अभिजित पवार, प्रफुल्ल ठाकरे, श्रीकृष्ण पखाले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे आज आंदोलन
By admin | Published: February 22, 2016 12:53 AM