अमरावती : शासनाचे आदेश, परिपत्रकाप्रमाणे संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने ग्रामीण महसुली कामकाज ठप्प पडले आहे. सुवर्ण जयंती अभियानात सेवानिवृत्त प्रकरणे, सेवापुस्तके अद्ययावत करण्या संदर्भातील तलाठ्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. दुष्काळ, गारपीट व अतिवृष्टी निधीवाटपाचा मेहनताना तहसीलदरांनी काढला. परंतु तलाठ्यांना दिलेला नाही. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या निर्णयाप्रमाणे प्र्रमाणे १,२७५ रुपये प्रवासभत्ता देण्यात आलेला नाही, ज्येष्ठता यादी १ जानेवारी पासून प्रसिध्द केलेली नाही. मात्र, कनिष्ठ लिपिकांच्या अव्वल कारकुन पदावर पदोन्नती २ महिन्यांपूर्वीच केल्या आहेत. तसेच संगणकाच्या कामाकरिता ४ जून १९९८ नंतर वयाची ४५ वर्षे पूर्ण करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अद्याप आॅपरेटर मदतनीस दिलेला नाही. तलाठी कार्यालय मालकाला शासनाने भाडे मंजूर केले आहे. हे भाडे अद्यापही देण्यात आलेले नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिने उशिरा होते. आदी मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा अमरावतीव्दारा असहकार आंदोलन पुकारल्याचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मदापुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तलाठ्यांचा शासनाशी असहकार
By admin | Published: September 10, 2015 12:10 AM