यशोमती ठाकूर : मतभेदापेक्षा मनभेद असू नये, दोनद येथे कार्यकर्ता मेळावाअमरावती : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. तसेच या चळवळीत काम करीत असताना मतभेद झाले तरी मनभेद असू नये, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. दोनद, अमरावती येथे गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर हे होते. आ. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. मात्र विदर्भ प्रदेश विकासापासून वंचित असल्याची भावना वेळोवेळी व्यक्त होते. पण त्या भागातील जनता विकासाभिमुख नेतृत्वाला नेहमीच बळ देते. याउलट विदर्भात एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो. याचे चिंतन आपण करायला हवे. त्यामुळे नेमकी चूक कुठे होते याची कारणे लक्षात येतील. सध्या देश असो की राज्य यामध्ये विशिष्ट शक्ती कार्यरत झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या गावाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. माणूस हा कर्तव्याने मोठा होतो. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासन पातळीवर मांडायला हवे. केवळ राज्यात सत्ता गेली म्हणून आपण शांत बसून चालणार नाही, असे ही त्या म्हणाल्या. या मेळाव्याला अमरावती तालुका कॉंग्रेस कमिटी, तिवसा विधानसभा युवक काँग्र्रेस, महिला काँग्रेस व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन हरीश मोरे यांनी, तर आभार नंद खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)
काँग्रेस पक्ष नव्हे, चळवळ !
By admin | Published: February 27, 2016 12:01 AM