अमरावती : मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासनाची लगबग सुरू झालेली आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे १६ नियंत्रण कक्ष १ जूनपासून पुढील चार महिन्यांकरिता उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
जिल्ह्याचा ७० टक्के भूभाग हा ग्रामीण आहे. यामध्ये ४८२ गावे पूरप्रवण आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्ष महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यात १४ ही तालुक्यांच्या मुख्यालयी तसेच जिल्हा व विभागस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १६ कक्ष जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास, प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आल्यास, नदी, नाल्याच्या पात्रांमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यास डोंगराळ क्षेत्रात अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. यामुळे ४८२ गावे बाधित होत असल्याची नोंद आहे. अशी स्थिती उद्भवल्यास १,९२६ पोहणाऱ्यांची नोंद महसूल प्रशासनाकडे आहे. या सर्व नागरिकांची मदत व शोध, बचाव पथकांच्या साहाय्याने नागरिकांना तत्काळ मदत मिळते.
आपत्ती उद्भवल्यास जिल्ह्यात मोटर बोट ६, लाईफ जॅकेट २२२, रेिंग जीकेट १२६, रोप बंडल २२, सर्च लाईट २२, मेगा फोन २२, ऑक्सिजन किट २२, बीओबी रोप १५, फायर एक्सटीग्युशर ३०, रबर ग्लोव्हज ३० लेदर ग्लोव्हज ३० आदी साहित्य उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आपत्ती प्राधिकरण अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.
बॉक्स
पथकांमध्ये प्रशिक्षित ४१७ मनुष्यबळ
जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडे प्रशिक्षित ४१७ मनुष्यबळ आहे. यामध्ये शोध व बचाव पथकात ३५१, प्राथमिक उपचार कक्षात ४, स्कुबा ड्रायव्हर २, मास्टर ट्रेनर १६, एनजीओ २, रेडक्रास सोसायटीचे ४२ मनुष्यबळ उपलब्ध आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने विविध विभागाच्या जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्याची माहिती रामेकर यांनी दिली.