मूळ मालकांना परत, २५ संच राज्याबाहेर, हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू
अमरावती : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वर्षभरात हरविलेल्या १०५ मोबाईलपैकी ८० संच बुधवारी मूळ मालकांना परत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. उपस्थित होते.
पोलीस सूत्रांनुसार, १ जानेवारी ते डिसेंबर २०२० वा कालावधीत अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या विविध ठाण्यांच्या हद्दीतून मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १०५ मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला. त्यापैकी एकूण ८० मोबाईल राज्यातील विविध भागांतून हस्तगत करण्यात आले. २५ मोबाईल परप्रातांत असल्याने ते हस्तगत करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, असे याप्रसंगी कळविण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल १३ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक चौबे यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले. तपासकार्यात अमरावती ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.