अमरावती: परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरणामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका असल्याबाबत ‘अलर्ट’ जारी केले आहे. त्यानुसार गत चार दिवसांपूर्वी मृत कावळे, घुबड आणि कोंबड्यांच्या नमुने चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. नेमका अहवाल काय येतोय? याकडे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
बडनेरा जुनी वस्तीच्या दत्तविहार भागात २९ गावरान कोंबड्या दगावल्या. तर, धारणी येथे तीन कावळे आणि अचलपूर वनविभागात एक घुबड दगावल्याची नोंद आहे. त्यामुळे मृत कावळे, घुबड, कोंबड्यांचे नमुने पुणे येथील शासकीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. हे पक्षी कशामुळे दगावले, याचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सोमवारी नमुने चाचणीसाठी पाठविले असताना अहवालास विलंब लागत आहे. अशातच बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांनी घेतल्याने पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आल्याचे चित्र आहे. पोल्ट्री व्यवसायात शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढे काय होणार, याची चिंता सतावू लागली आहे. तूर्त बाहेरील जिल्ह्यातून पक्ष्यांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात हैदाबाद येथून पोल्ट्री, अंडी मोठ्या प्रमाणात मागविले जात असल्याची माहिती आहे.
----------------
मृत कावळे, घुबड, कोंबड्या असे सहा नमुने चाचणीसाठी मंगळवारी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. अद्यापपर्यंत अहवाल मिळाला नाही. त्यानंतर बर्ड फ्लू संदर्भात चित्र स्पष्ट होईल.
- विजय रहाटे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, अमरावती