अमरावती : खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यानंतरही बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने संत्रस्त झाल्याने एका तरुण शेतकऱ्याने बँकेसमोरच आत्मदहनाचा इशारा दिला. याबाबतची आपबिती कथन करणारे निवेदन त्या शेतकऱ्याने १७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
संदीप राऊत हे भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील तरुण शेतकरी. त्यांचे गावातीलच बँक ऑफ बडोदा शाखेत खाते आहे. ते नियमित खातेदार असतानाही त्यांना १७ जूनपर्यंत पीककर्ज मिळालेले नाही. त्यांनी संबंधित शाखा व्यवस्थापकाला पीककर्जाबाबत विनवणी केली. मात्र, मला वाटेल, तेव्हा कर्ज देईन, असा त्यांचा खाक्या असल्याचे राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे. येत्या पाच दिवसात पीककर्ज न मिळाल्यास बॅँक ऑफ बडोदा खारतळेगाव शाखेसमोर आपण आत्मदहन करणार आहोत, असा गंभीर इशारा नापिकीने रडकुंडीस आलेल्या या शेतकऱ्याने दिला आहे.
कोट
पीककर्जाची एक निश्चित प्रक्रिया आहे. आतापर्यंत ४ कोटी रुपये कर्जवितरण केले. कर्जप्रकरणे अधिक असल्याने त्यांना थोडे थांबायला सांगितले होते. त्यांना तातडीने कर्ज दिले जाईल.
- अनुप बुरघाटे,
शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा
खारतळेगाव