बडनेरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवाशांची संख्या नगण्य झाल्याने रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तथापि, संसर्ग कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गर्दी किंचित वाढल्याचे चित्र बुधवारी बडनेरा रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळाली.
विदर्भातून मोठ्या संख्येत मुंबई-पुण्याकडे प्रवास होतो तसेच तिकडूनही अमरावती, नागपूरकडे येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड घट झाली. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासन रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. आरक्षित तिकिटांची सक्ती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, गीतांजली, हावडा मेल, नवजीवन, हावडा-अहमदाबाद, हटिया आदी सुरू ठेवलेल्या मोजक्या गाड्या रिन्म्या धावत आहेत. एका बोगीत जेमतेम पाच ते दहा प्रवासी असल्याचे चित्र मागील महिन्यापासून आहे. आता राज्यात कोरोना संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढल्याचे दिलासादायी चित्र बुधवारी दृष्टीस पडले. पहिल्या लाटेनंतर दिवाळीच्या जवळपास रेल्वे प्रवासी संख्येत वाढ झाली. बंद झालेल्या रेल्वेगाड्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली होती.
रेल्वे प्रशासनाच्या मते, अजूनही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचा वानवा आहे. एखाद्याच गाडीवर गर्दी असते. अगदी वेळेवर प्रवाशांना रिझर्व्हेशन मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रवासी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणे टाळत आहेत.