पोलीस मित्राची कर्तव्यतत्परता : गृहराज्यमंत्र्यांनी केला गौरव अमरावती : महाविद्यालयात जाण्यासाठी ८ फेब्रुवारीला बसमधून प्रवास करताना ‘त्याने’ अपघात पाहिला. दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात. जखमी झालेली तरूणी त्याला दिसली. गंभीर जखमी अवस्थेत. भोवती बघ्यांची गर्दी. पण, मदतीसाठी कुणीच नाही. ती बेशुध्द होती. भळाभळा रक्त वाहत होते. कुणी चर्चा करीत होते. अपघात कसा झाला यावर कुणी मत व्यक्त करीत होते तर कुणी चक्क मोबाईलमध्ये फोटोसेशन करीत होते. पण, ‘तो’ बसमधून खाली उतरला. त्याने तरूणीला पाणी पाजले. पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. आज ती जिवंत आहे. या धाडसी आणि कर्तव्यतत्पर पोलीस मित्राच्या कर्तृत्वाचा गृहराज्यमंत्र्यांनी नुकताच गौरव केलाय. त्याचे वय अवघे अठरा वर्षे. विदर्भ महाविद्यालयात कंप्युटर सायन्सचा विद्यार्थी. सायन्सचा विद्यार्थी म्हटला की अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलाची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण, तो पुस्तकी कीडा नाही. आसपास घडणाऱ्या घटनांचे सामाजिक भान त्याला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीवही त्याला आहे. त्याचे नाव वैभव नंदकिशोर निमकर. तो मूळ भातकुली येथील रहिवासी. शहरातील विमवी तो कंप्युटर सायन्सला शिकतोय. समाजसेवेच्या या आवडीमुळेच तो ‘पोलीस मित्र’ बनलाय. तो म्हणतो, ‘त्या अपघातग्रस्त तरूणीमध्ये मला माझी बहिण दिसली. मी लगेच डीसीपी सोमनाथ घार्गेंना दूरध्वनी केला. ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस ताफ्याने तरूणीला इर्विनमध्ये नेले. आज ती जिवंत आहे. माझ्यामुळे एका तरूणीचे प्राण वाचले, यातच सगळे आले.’ (प्रतिनिधी)सैन्यात अधिकारी व्हायचंयशिक्षणात हुशार असलेल्या वैभवला सैन्यात जाऊन अधिकारीपद भूषविण्याची इच्छा आहे. देशप्रेमाच्या वेडाने झपाटलेल्या वैभवला समाजातील दुर्बल घटकांना मदत करायचीय. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे आहेत. नागरिकांनी कर्तव्य बजावावे'लोकमत'शी बोलताना वैभव म्हणाला, एखादा अपघात घडल्यास नागरिक बघ्याची भूमिका घेतात. जखमीला रूग्णालयात पोहोचविण्याचे सौजन्यदेखील कुणी दाखवीत नाही. पण, नागरिकांनी त्यांचे कर्तव्य बजावल्यास अनेक अपघातग्रस्तांना जीवदान मिळू शकतात.
‘वैभव’च्या धडपडीने ‘ती’ला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 12:17 AM