नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये कमालीची घसरण नोंदविली आहे. यामुळे अनेक शोरूम बंद पडू लागले असून या क्षेत्रावर अवलंबून असलेले जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
वाहन क्षेत्राने या वर्षीच्या सुरुवातीपासूनच विक्रीमध्ये घसरण नोंदविली आहे. भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने काही दिवसांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याने याचा थेट फटका स्टील इंडस्ट्रीला बसला आहे. जमशेदपूरमधील 30 स्टील कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबवत टाळे ठोकले आहे. तर तेथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाने उत्पादन थांबविले आहे.
तसेच कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना 12 ऑगस्टलाच कामावर येण्याची सूचना केली आहे. तर नियमित कर्मचारी 5 ऑगस्टपासून कामावर येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कंपनीमध्ये केवळ 15 दिवस काम झाले आहे.