पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील माजलगाव धरण क्षेत्रात मागील ४-५ दिवसात कमी जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे महिनाभरात धरणाच्या पाणी पातळीत ७ टक्यांनी वाढ झाली. धरण क्षेत्रात यावर्षी सरासरीच्या ४४ टक्के पावसाची नोंद झाली.
यावर्षी चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने व मान्सूनपूर्व पाऊस दोन दिवस पडल्याने नाल्या, ओढे वाहू लागली आहेत. मान्सूनपूर्व जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली.
माजलगाव धरणात २ जून रोजी ४२७.४४ मीटर एवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात १९३.६० दलघमी एवढा एकूण पाणी साठा होता तर ५१.६० दलघमी एवढा उपयुक्त पाणी साठा होता व १६.६० टक्के पाणी होते. ३ जून रोजी धरणात ४२७.४६ मीटर पाणी साठा होता. धरणात १९४.४० दलघमी एवढा एकूण पाणी साठा होता. तर ५२.४० दलघमी एवढा उपयुक्त पाणी साठा होता. एकूण १६.७९ टक्के पाणी साठा झाला होता. बिगरमोसमी पहिल्याच पावसात ०.२५ टक्के पाणी पातळी वाढली.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मृगातच जवळपास पेरण्या, खुरपणी व कोळपणीसह इतर मशागतीची कामे उरकली होती. या दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे दुबार पेरणीचे संकट येते की काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मागील आठवड्यात कमी-जास्त प्रमाणात तालुक्यात पाऊस झाला.
या पावसामुळे पिकांनाही जीवदान मिळून धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली.
माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत ७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. धरणात बुधवारी सकाळी ४२७.९२ मीटर इतका पाणी साठा होता. धरणात २१४.८० दलघमी एवढा एकूण पाणी साठा होता. तर ७२.८० दलघमी एवढा उपयुक्त पाणी साठा होता तर २३.३३ टक्के पाणी साठा झाला होता.
मागील एक महिन्याच्या काळात धरण क्षेत्रात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत ४४ टक्के पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपर्यंत ३३२ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाची सरासरी ७५० मिमी असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी. आर. शेख यांनी दिली. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
140721\img_20190516_122545_14.jpg