लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या. महसूल संघटनेकडून बदलीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पुन्हा काही जणांच्या बदल्या रद्द करून त्यांना पदस्थापना दिली आहे; मात्र १० टक्के विनंती बदलीसाठी आदेश काढला आहे. जर चुकीची व खोटी माहिती दिली तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर महसूल संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तर काही जण मॅटमध्येदेखील गेले आहेत. त्यावर सुनावणीदेखील होणार आहे. दरम्यान, विनंती बदलीसाठी जिल्हाधिकारी यांनी २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना बोलावले होते. यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विनंती बदलीवर निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी दिलेली कारणे जर खोटी ठरली किंवा विनंती बदलीसाठी काही चुकीच्या माहितीचा आधार घेतल्याचे निदर्शनास आले तर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिला आहे. या आदेशामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.