पौर्णिमा काला होईपर्यंत भगवानगडाच्या मठात मुक्काम
शिरूर कासार : हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या चरण पादुका मंगळवारी गडावरून निघून पंढरपुरात दाखल झाल्या असून पौर्णिमेचा काला होईपर्यंत भगवान गडाच्या पंढरपूर येथील मठातच त्या विसावणार असल्याची माहिती भगवान गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांनी दिली.
संत भगवान बाबांनी गडावरून पायी दिंडी सोहळा सुरू केला होता. परंपरेप्रमाणे संत भीमसिंह महाराज यांनीदेखील तो वसा चालवला होता.त्यानंतर विद्यमान महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी तीच परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली. मात्र, गेल्यावर्षी व यंदाही कोरोनाचे संकट आडवे आल्याने शासन निर्देशानुसार दिंडी परंपरा ही संत पादुका वाहनांमध्ये नेऊन औपचारिकता पूर्ण करावी लागली. महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी गडावरून यथावत पूजा करून पादुकांचे प्रस्थान झाले. भगवान गडाचे साधक पादुका प्रस्थानवेळी आवर्जून उपस्थित होते. पादुकांसोबत प्रधान आचार्य नारायण स्वामींसह ॲड. भाऊसाहेब बटूळे, जीवन सानप, बळिराम महाराज आदी मंडळींसमवेत होती.
वारकरी आनंदाला पारखे
संत पादुकांना चंद्रभागेचे तीर्थस्नान घालून परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मठात विसावल्या असून काला झाल्यानंतर त्यांना गडावर आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले. श्रीक्षेत्र भगवानगडावरून हा दिंडी सोहळा हजारो भाविकांसह पंढरपूरला जात असतो. दहा मुक्काम करून पंढरपूरला पोहोचत असतो. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी वाहनाद्वारेच पादुका पंढरपूरला पोहोचल्या आहेत. संतांसमवेत भजन करत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मात्र या आनंदाला पारखे व्हावे लागले आहे.